1899 – 1983
बाबूजींचा जन्म 30 एप्रिल 1899 रोजी शाहजहानपूर (उत्तर प्रदेश) या उत्तर भारतीय शहरात झाला. लहानपणापासूनच, त्यांना आध्यात्मिक साक्षात्काराची तीव्र आस होती ज्यामुळे सर्व आवडींकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
शाहजहानपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी तीस वर्षांहून अधिक काळ कारकूनाची जबाबदारी सांभाळली. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले आणि त्यांची पत्नी भगवती यांनी 1949 मधील तिच्या निधनापूर्वी दोन मुली आणि चार मुलगे यांना जन्म दिला.
वयाच्या बाविसाव्या वर्षी, जून 1922 मध्ये लालाजींची व त्यांची भेट झाली व त्यांचा उत्तराधिकारी म्हणून काही वर्षांपूर्वी स्वप्नात दिसलेली व्यक्ती म्हणून त्यांनी बाबूजींना ओळखले.
1931 मध्ये लालाजींनी देह सोडण्यापूर्वी गुरू आणि शिष्य यांच्यात जरी फारच कमी भेटी झाल्या होत्या, तरी बाबूजी लालाजींच्या सतत स्मरणात होते आणि त्यांच्या आंतरिक मार्गदर्शनाशिवाय ते एक क्षणही जगू शकत नाहीत असा त्यांचा दृढ विश्वास होता. बाबूजींचा असा विश्वास होता की चेतनेची उत्क्रांती हा सर्वांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि सर्वत्र प्रामाणिक साधकांना ते मुक्तपणे प्रदान केले पाहिजे. खरा गुरू हा परम सेवक आहे यावर त्यांचा विश्वास होता आणि जात, पंथ, धर्म, लिंग किंवा राष्ट्रीयत्व याची पर्वा न करता सर्वांची सेवा करत त्यांनी जीवन व्यतीत केले. त्यांनी शिकवले की पक्ष्याच्या दोन पंखांप्रमाणे भौतिक आणि अध्यात्मिक जीवन हातात हात घालून जाते, आणि प्रेम व त्याग हे दुहेरी गुण शिकण्यासाठी गृहस्थाचे सामान्य जीवन हे सर्वोत्तम वातावरण आहे. त्यानुसार, त्यांनी राजयोगाची प्रणाली सरल आणि परिपूर्ण केली जेणेकरून प्रत्येकाला त्याचा सराव आणि फायदा घेता येईल.
त्यांनी आपल्या अभ्यासींना त्यांच्या चुका आणि कमतरतांमुळे निराश न होता, झालेल्या चुका सोडून त्यांची पुनरावृत्ती न करण्याचा संकल्प केला पाहिजे असा सल्ला दिला. त्यांनी आठवण करून दिली की वर्तमानातच आपण आपले चारित्र्य विकसित करतो ज्यामुळे उज्ज्वल भविष्य घडवता येते.
स्वभावत: बाबूजींचे व्यक्तिमत्व अत्यंत विनम्र होते आणि त्यांची त्यांच्या गुरूवर अपार श्रद्धा होती. प्रत्येक संस्कृती आणि राष्ट्रीयतेचे साधक त्यांनी देऊ केलेल्या साध्या आणि प्रभावी पद्धती स्वीकारतील अशी त्यांना खात्री होती. 1972 मध्ये, त्यांनी चेन्नईचे सहकारी श्री. पार्थसारथी राजगोपालाचारी यांच्यासमवेत हार्टफुलनेस पद्धत युरोप आणि अमेरिकेत नेली. पार्थसारथींना, त्यांचे सहकारी चारीजी म्हणून ओळखत, आणि बाबूजींच्या नंतर त्यांचे उत्तराधिकारी आणि हार्टफुलनेस परंपरेतील तिसरे गुरू म्हणून त्यांची निवड केली गेली.